-डॉ. राजू पाटोदकर, मुंबई
सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मश्री श्रीदेवी यांचा २४ फेब्रुवारी हा स्मृतीदिन. त्यांच्या स्मृतीस भावांजली.
आपल्या उत्तम अभिनयाने त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या आहेत .त्यांच्या या कारकिर्दीला तमाम सिनेसृष्टी कधीच विसरू शकणार नाही. श्रीदेवी म्हणजे श्रीअम्मा यंजर. तामिळनाडूच्या शिवकाशी या गावी 13 ऑगस्ट 1963 ला जन्म. तमिळ, तेलुगू , कन्नड, मल्याळम आणि हिंदी चित्रपटातील आघाडीची नायिका म्हणून लोकप्रिय. 1970 नंतरच्या दोन दशकात त्यांनी हिंदी सिनेसृष्टीला भुरळ घातली आणि आपल्या अभिनयाने सिने रसिकांवर अधिराज्य केले.
पंचभाषेत कारकीर्द
मातृभाषा तेलगु असलेल्या श्रीदेवीच वडील वकील होते. बालपण शिवकाशी येथेच गेले. तद्नंतर १९६७ ला तिने Kandan karunai या तामिळ चित्रपटातून प्रथम बालकलावंत म्हणून भूमिका केली. त्यानंतर तिच्या अभिनय प्रवास तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी अशा पंचभाषेत झाला. हा प्रवास करीत असताना सुप्रसिद्ध निर्माते के. बालचंदर यांच्या ( Moondru mdrichu) या चित्रपटातून १९७६ ला मोठा ब्रेक मिळाला, या चित्रपटात तिच्या सोबत दक्षिणेचे दोन दिग्गज म्हणजे रजनीकांत व कमल हसन होते. याच दरम्यान तिने तेलगू चित्रपटातून काम सुरू केले. के. राघवेंद्रराव यांनी एन. टी. रामराव सोबत श्रीदेवीस विविध चित्रपटातून काम दिले. त्यामुळे या दरम्यान सिने तेलगूच्या नामवंता सोबत भूमिका केल्या.तेलगु , तामीळ च्या विविध सुपर हिट चित्रपटानंतर श्रीदेवीने मोर्चा हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळविला आणि हिंदी सिनेसृष्टीत सुपरहिट चित्रपट देणारी नायिका मिळाली. १९७८ ला ‘सोलवा सावन’ या चित्रपटाद्वारे तिने आपली हिंदी सिनेसृष्टीची कारकिर्द सुरू केली. त्या पूर्वी ‘ज्यूली’ चित्रपट केला तो फारसा चालला नाही. त्या नंतर तिने आपली जोडी जितेंद्र सोबत जमविली. के राघवेंद्रराव आणि के बापय्या दोन यांनी दिग्दर्शित केलेल्या तेलगू चित्रपटांच्या हिंदी रिमेक द्वारे आपली हिंदी कारकिर्द सुरू ठेवली. यात तिला मोठ्या प्रमाणात यश मिळाले. तिच्या दूसरा चित्रपट ‘हिंमतवाला’ श्रीदेवीसाठी महत्वपूर्ण ठरला, आणि श्रीदेवी हिंदी भाषिक प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री झाली. ‘हिंमतवाला’ चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना भावली व बिनधास्त अभिनेत्री तरूणाईची धडकन बनली. जितेंद्र सोबत तिने त्या काळात मवाली, तोहफा, जस्टीस चौधरी असे चित्रपट साकारले. दरम्यानच्या काळात तिने कमल हसन सोबत आपला ‘सदमा’ हा चित्रपट केला. ‘सदमा’ मध्ये श्रीदेवीने केलेला अभिनय आणि कमल हसनचा अप्रतिम अविष्कार प्रेक्षक विसरूच शकत नाहीत. एका स्मृतीभ्रंश झालेल्या मुलीची भूमिका तिने यात साकारली होती. चित्रपटाचा शेवट मनास चटका लाऊन जाता, काही भावुक प्रेक्षक आपले अश्रु रोखू शकत नाहीत, असा अत्यंत भावपूर्ण शेवट या चित्रपटाचा आहे. हा चित्रपट तामिळ च्या Moondram pirai या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटातही श्रीदेवी व कमल हसनच होते. ८० च्या दशकात श्रीदेवीचे विविध हिट चित्रपट आले. यात कर्मा, नगिना, मि इंडिया, सुहागन, औलाद, मक्सद, अशा चित्रपटांचा समावेश आहे.
डबलरोलची किमया
श्रीदेवीने आपल्या कारकिर्दीच्या या कालखंडात अनेक प्रकारच्या भूमिका केल्या. तिने १९८९ ला ‘चालबाज’ या चित्रपटातून भूमिका (डबलरोल) केली. रजनीकांत व सनीदेवल हे तिचे नायक होते. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर चे उत्कृष्ट अभिनेत्री हे अॅवॉर्ड मिळाले. त्यानंतर तिने यश चोप्रांच्या ‘लम्हे’ मधून डबलरोल केला आणि महत्वाचे म्हणजे या चित्रपटासाठी देखील तिला १९९२ ला परत फिल्म फेअरचे उत्कृष्ट अभिनेत्री अॅवॉर्ड मिळाले. अमिताभ बच्चन यांच्या समवेत श्रीदेवीने ‘खुदा गवाह’ या चित्रपटातून देखील डबल रोल केला. Kshana kshanam या तेलगू चित्रपटातील भूमिकेसाठी तिला दाक्षिणात्य फिल्मफेअर अॅवार्ड व नंदी ॲवॉर्ड हे मान्यवर पुरस्कार मिळाले. यश चोप्रांचा ‘चांदणी’ हा एक महत्वपूर्ण असा चित्रपट श्रीदेवीने केला. या चित्रपटातील तिची भूमिका तिच्या कारकीर्दीचा महत्वाचा टप्पा ठरली. अत्यंत सहज व सुलभ अभिनयाने या चित्रपटातील ‘चांदणी’ असलेली श्रीदेवी चित्रपट रसिकांच्या काळजात भिडली. ‘चांदणी’तील तिची अदाकारी तिचे नृत्य. तिचा अप्रतिम अभिनय, प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिचे त्यावर्षीच्या फिल्मफेअरसाठी नामांकन झाले होते. आपल्या कारकिर्दीत श्रीदेवीने सदमा, चांदणी, खुदा गवाह, गुमराह, लाडला आणि जुदाई या चित्रपटांसाठी नामांकन मिळविले. विविध प्रकारच्या भूमिका सहजपणे साकारण्याची तिची खुबी आहे. अत्यंत सहज अभिनय तिच्या नसानसात भिनला आहे, असे म्हटले तर ते तिच्या बाबतीत वावगे ठरत नाही. हे तिच्या अनेक चित्रपटांनी दाखवून दिले आहे. नृत्य हा तर तिच्यातील महत्वाचा पैलू.अनेक चित्रपटातील तिचे नृत्य खूपच लोभस वाटतात. त्यामुळे ते गाणे व चित्रपट लोकप्रिय झाले आहेत.अशी देखील बरीच उदाहरणे आहेत. मि. इंडीया मधील ‘काटे नही कटते ये दिन ये रात’ हे असो की, ‘हवा हवाई’ हे गित असो अथवा ‘करते है हम प्यार मि इंडिया से ले’ हे गित असो तसेच ‘नगिना’ मधील तिने केलेले सर्पनृत्य असो.. हे पाहतांना प्रत्यक्ष संगीतच स्थब्ध होते की काय असे आपणास वाटू लागते. कर्मा, इन्कलाब , मास्टरजी, गुमराह , जॉबाज, जोशिले, वक्त की आवाज, सोने पे सुहागा आखरी रास्ता, फरिश्ते अशी अनेक चित्रपटांची नावे व तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच स्मरणात आहेत. तिने हिंदीतील सर्वच आघाडीच्या कलावंतासोबत भूमिका केल्या. धर्मेंद्र, विनोद खन्ना, अमिताभ बच्चन, ऋषीकपूर ,राजेश खन्ना, मिथुन चक्रवर्ती, अनिल कपूर,राकेश रोशन , संजय दत्त, सनी देओल, जॅकी श्रॉफ, ते शाहरूख खान पर्यंत महत्वाचे अभिनेते तिचे नायक होते.
छोटा पडदा
छोट्या पडद्याचे आकर्षण श्रीदेवीलाही मोहित करत गेले आणि तिने सहारा वाहिनीवर ‘मालिनी अय्यर’ द्वारे प्रवेश केला. हा तिचा प्रयत्न रसिक प्रेक्षकांना फारसा भावला नाही किंबहुना प्रेक्षकांना तो आवडला नाही , प्रेक्षकांनी त्यास नाकारले. श्रीदेवीला देखील त्याची जाण होतीच म्हणूनच काय ते तिने परत अभिनयासाठी छोटा पडदा टाळला. तथापी विविध शोजच्या माध्यमातून तिने आपले दर्शन या पडद्यांना घडविले. मग तो तिचा जीना इसि का नाम है असो की १० का दम असो प्रेक्षकांना ती श्रीदेवी म्हणून दिसली. चित्रपट कारकिर्द जोरात सुरू असताना तिने बोनी कपूर सोबत आपला संसार थाटला व अनिल कपूरची भाभी झाली. जान्हवी व खुशी या दोन मुली.
श्रीदेवी यांची पाच भाषेतील सिने कारकीर्द निश्चितच भारतीय सिनेसृष्टीतील सुवर्णपर्ण आहे. सिनेरसिकांच्या मनातील व हृदयातील त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. त्या अजरामरच आहेत…
एक जिंदादिल अवखळ आणि प्रगल्भ अशी अभिनेत्री असलेल्या श्रीदेवी यांचे 24 फेब्रुवारी 2018 दुबईत हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने रोजी निधन झाले. आणि भारतीय सिनेसृष्टी एका गुणी अभिनेत्रीला मुकली. मॉम या चित्रपटासाठी त्यांना नॅशनल अवॉर्ड जाहीर झाले होते. त्यांच्या पश्चात पती व मुलींनी हे अवॉर्ड मा. राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते स्वीकारले.
(पद्मश्री श्रीदेवी यांचा या लेखात बऱ्याच ठिकाणी एकेरी उल्लेख आहे .तो केवळ सिनेचाहत्यांची आवडती अभिनेत्री म्हणूनच ..
कारण आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला नेहमी एकेरी संबोधतो.)
सुनहरी यादे
सिनेपत्रकार म्हणून काम करताना मी श्रीदेवी यांना 23 एप्रिल 87 रोजी भेटलो होतो . गोरेगाव वेस्ट च्या फिल्मीस्थान studio येथे ‘रामवतार’ या चित्रपटाचे शूटिंग होते. ‘उंगली में अंगुठी’ या गाण्याचे चित्रीकरण सुरू होते. सनी देओल पण होते . त्यावेळी मी श्रीदेवी यांची मुलाखत घेतली आणि माझ्या ऑटोग्राफ बुकमध्ये त्यांची ऑटोग्राफ देखील घेतली. त्यावेळी त्यांना पहिल्यांदा ‘मक्सद’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी हैदराबाद येथे पाहिले असल्याचे सांगितले. 25 जानेवारी 84 हैदराबाद येथे नेहरू झूऑलॉजिकल पार्क मध्ये या चित्रपटातील ‘ऊई ऊई गरमी है..कहाँ है..’ हे गीत राजेश खन्ना आणि श्रीदेवी यांच्यावर चित्रित होत होते. मोठ्या गर्दीतील एक सिनेदर्दी म्हणून मी हे शूटिंग पाहात होतो. हिम्मतवाला, मवाली, तोहफा या चित्रपटाचे दिवस आमचे टिन एज आणि श्रीदेवीचे दर्शन जबरदस्त योगायोग त्यावेळी जुळून आला… दुपारी शुटिंग पाहिले आणि रात्री तेथील lamba या टॉकीजला त्याच दिवशी प्रदर्शित झालेला अमिताभ व श्रीदेवी यांचा ‘इन्कलाब’ चित्रपट पाहिला म्हणून ही तारीख लक्षात..
Dr Raju Patodkar
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय मुंबई येथे वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती) (वर्ग-1) या पदावर कार्यरत.
शिक्षण- पीएच.डी, एम.ए., (जर्नालिझम), एम.ए., (मराठी), एम.ए., (राज्यशास्त्र), एम.ए., (समाजशास्त्र), बॅचलर इन ड्रामा, हिंदी (पंडित), जीडीसीए, बी.कॉम, बी.जे., जवळपास दोनशे मराठी, हिंदी मालिका तसेच 25 मराठी चित्रपटात अभिनय. राज्यातील विविध वर्तमान पत्रातून लेखन. जवळपास 5 हजार लेख-मुलाखती प्रकाशित.
पी.एच.डी. विषय श्री. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील सामाजिक वास्तवाचा संवाद एक चिकित्सक अभ्यास. (1975 ते 2005)
भ्रमणध्वनी क्र.- 9892108365.
3 Comments
Rahul
Good recap of Sridevi’s career.
Julie was not a flop movie; besides it was her debut as child.
Also, Jaag Utha Insaan, English Vinglish deserve mention here.
admin
Thanks for your comment. Regards.
admin
thanks for your feedback